जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना इराननं मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांनी शांततेची भूमिका घ्यावी, तणाव कमी करावा असं इरानने म्हटलं आहे. यापूर्वी सौदी अरेबियानं देखील भारत आणि पाकिस्तामध्ये वाढत असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली होती. सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर आता इरानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील शांततेतचं आवाहन केलं आहे.
इरानचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भारत (Bharat) आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी देश आहेत. ज्यांच्यासोबत शेकडो वर्षांपासून आमचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध आहेत, इतर देशांप्रमाणेच आम्ही देखील या संबंधांना प्राथमिकता देतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी समजस्याने भूमिका घ्यावी, असं अब्बास यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी देखील भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून संवाद साधला.
याबाबत ट्विट करत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी माहिती दिली आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांच्याशी फोनवर संवाद साधला. पहलगाम हल्ला आणि भारत व पाकिस्तान संबंधांवर यावेळी चर्चा झाली. दुसरीकडे पाकिस्तानने देखील सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाचा फोन आल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आमच्यासाठी जवळचे आहेत. दोन्ही देशांमध्ये कायमच तणाव राहिला आहे, मात्र ते त्यावर तोडगा काढतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तान (Pakistan) बॉर्डरवर सध्या तणावाचं वातावरण असून हालचालींना वेग आला आहे.