अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडे मागणी
अमरावती(Amravati)26 जून:- अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील नागरी वस्तीमध्ये वीज रोधक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पंकज मेश्राम यांनी केली. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि राज्याच्या मुख्य सचिवांना मेश्राम यांनी लेखी निवेदन दिले आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज पडून जीवित वित्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अमरावती जिल्ह्यात सन 2023 या वर्षात वीज पडून 6 नागरिकांचा तर 2024 मध्ये आत्तापर्यंत दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. नुकताच संजय गांधी नगर येथे एका 5 वर्षीय चिमुकलीचा 11 जून 2024 रोजी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वीज कोसळल्यामुळे होणाऱ्या धोक्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास त्याचा नागरिकांना फायदा होऊ शकतो. विज पडून होणाऱ्या एकूण मृत्यू पैकी 86 टक्के मृत्यू शेतात काम करणाऱ्या व्यक्तींचे असतात. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात राहणारे मुख्यतः शेतकरी शेतमजूर वादळ वाऱ्याची चिन्हे दिसली तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याही परिस्थितीत काम करतात पण आपल्या जीवावर होणाऱ्या परिणामाचा ते विचार करत नाहीत.
शहरी भागात मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आलेले मोबाईल टावर यामुळे सुद्धा वीज पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी झाडाखाली थांबू नये जनावरे झाडाखाली बांधू नये. घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. दरवाजे खिडक्या ही बंद ठेवाव्यात मोकळ्या मैदानात असल्यास खाली बसून दोन्ही गुडघ्यात मान घालून दोन्ही हात कानावर धरावेत. अमरावती शहरातील संजय गांधी नगर यशोदा नगर, वडरपुरा ग्रेटर कैलास नगर मंगलधाम, फ्रेझरपुरा ,प्रशांत नगर किशोर नगर ,बेलपुरा महाजनपुरा आनंदनगर, अकोली जुनी वस्ती नवी वस्ती बडनेरा या परिसरात गेल्या दहा वर्षापासून वीज पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. या भागातील नागरिकांचे संरक्षण व्हावे याकरिता बडनेरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडे वीजरोधक यंत्र बसविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे केली आहे.