मुंबई (Mumbai) :- इस्रायल-इराणमध्ये युद्ध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरु केलं आहे. इराणमधून विशेष विमानाने भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. आता भारताने आपल्या ऑपरेशन सिंधूचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने शेजारच्या मित्र देशांना मदत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत आता इराणमध्ये अडकलेल्या नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारत आपल्यासोबत या दोन देशातील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचवणार आहे. चीन दक्षिण आशियामध्ये बांग्लादेश आणि पाकिस्तानसोबत मिळून नवीन आघाडी बनवत असताना भारत हे काम करणार आहे.
भारतीय दूतावासानुसार, नेपाळ आणि श्रीलंकन सरकारच्या शिफारसीवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळ आणि श्रीलंका हे भारताचे शेजारी देश असून रणनितीक दृष्टीने भारतासाठी हे दोन्ही महत्त्वाचे देश आहेत. आम्ही श्रीलंकन आणि नेपाळी (Narendra Modi) नागरिकांची सुद्धा मदत करणार आहोत, असं भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलय. दोन्ही देशांनी ऑपरेशन सिंधू अंतर्गत आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या इराण बाहेर काढण्याची विनंती केली होती.
भारतीय दूतावासाने यासाठी एक फोन नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या या नंबरवर संपर्क करणाऱ्या लोकांची आधी पडताळणी होईल. मग, त्यांना ऑपरेशन सिंधू अंतर्गत परत आणलं जाईल. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार इराणमध्ये त्यांचे 16 आणि इस्रायलमध्ये 5500 नागरिक आहेत. नेपाळ सरकारने सांगितलं की, इराणमध्ये त्यांच्या पाच नागरिकांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्री तस्करीचा आरोप आहे.