सत्ता स्थापनेत अपक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका
संपर्क साधण्यासाठी नागपुरातून हालचाली
फोटो : विधानसभा
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. त्यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले. यात अनेक संस्थांच्या एक्झिट पोलने सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या बाजूने कौल दिला असला, तरी काही एक्झिट पोलने राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा जवळपास १५ ते २५ अपक्ष उमेदवार निवडून येतील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ कमी पडू नये यासाठी भाजपसह काँग्रेसने देखील अपक्षांशी संपर्क साधण्याची तयारी चालवली आहे.
एक्झिट पोलच्या भाकितांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारला पत्रकारांशी चर्चा करताना अपक्षांना सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले. बहुमताने महायुती सरकार सत्तेत आले तरी, आम्ही अपक्षांनाही सोबत घेऊ, असे बावनकुळे म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आम्ही कोणत्याही अपक्षासोबत संपर्क साधला नसल्याचे सांगितले.
दुसरीकडे मात्र, काँग्रेसच्या गोटातून मोठी माहिती पुढे समोर आली आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेस द्वारे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पार पडताच सरकार स्थापनेसाठीचे नियोजन सुरू झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास मोठ्याप्रमाणात वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या ‘व्यवस्थे’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या आमदाराशी कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल हाती येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. नागपूर हे हालचालीचे केंद्र असणार आहे.