कोलकाता रेप-हत्या केस-11 दिवसांनंतर AIIMS डॉक्टर्सचा संप मागे
CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासन
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (22 ऑगस्ट) सुनावणी झाली. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी 11 दिवसांचा संप मागे घेतला आहे. यापूर्वी CJI म्हणाले होते की डॉक्टरांनी कामावर परतावे. रुग्णालयांची स्थिती मला माहीत आहे. माझ्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असताना मी स्वत: सरकारी रुग्णालयाच्या जमिनीवर झोपलो आहे. आम्हाला अनेक ईमेल मिळाले आहेत ज्यात डॉक्टरांनी त्यांच्यावर खूप दबाव असल्याचे सांगितले आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, आम्हाला सांगण्यात आले की डॉक्टर कामावर परत जाण्यास तयार आहेत. राज्य सरकारे डॉक्टरांसाठी काही सुरक्षा व्यवस्था करू शकतात. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला राज्यांचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्या समन्वयाने सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश देतो. हे 1 आठवड्यात पूर्ण केले पाहिजे. राज्याने 2 आठवड्यांत त्याची अंमलबजावणी करावी.
———-
इक्बालसिंह चहल यांची बदली
मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले IAS इक्बालसिंह चहल यांची बदली झाली आहे. इक्बालसिंह चहल यांना आता गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. चहल यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार होता. त्यांची बदली होऊन आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील.
———
बदलापूर केसमध्ये उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध
बदलापूर प्रकरणात काय घडणार ?
बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. शाळेच्या संचालक मंडळाची प्रकरण दडपून टाकण्याची भूमिका त्याहीपेक्षा संतापजनक आहे आणि पोलीसांनी केस नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई अक्षम्य आहे.बदलापूर अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली. मात्र या नेमणुकीला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र विरोध केलाय. भाजपचे प्रवक्ते या प्रकरणात सरकारी वकील कसे काय असू शकतात? आणि हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण असणार ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय.यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
————
अत्याचारप्रकरणी राज ठाकरेंचे मोठे विधान
बदलापूर प्रकरणावरुन मोठं वक्तव्य
बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी काल गोंदियातील मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर बदलापूर प्रकरणावरुन मोठं वक्तव्य केले. माझ्या हाती सत्ता द्या, कोरा करकरीत महाराष्ट्र करुन दाखवतो, असे विधान राज ठाकरेंनी केले.
—————
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची युती
फारूख अब्दुल्लांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींची घोषणा
राहुल आणि खरगे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 21 ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही नेते श्रीनगरला पोहोचले. दुसऱ्या दिवशी दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.श्रीनगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करणे आणि त्याला राज्याचा दर्जा मिळवून देणे सर्वात महत्त्वाचे आहे. या भूमीशी माझे रक्ताचे नाते आहे. अशा परिस्थितीत जनता आम्हाला निवडणुकीत नक्कीच साथ देईल असे राहुल म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास तोडला आहे.
————-
देशातील 151 लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे
खासगी संस्थांच्या अहवालात पुढे आली माहिती
पश्चिम बंगालसह देशातील इतर भागामधल्या अत्याचाराच्या घटनांमुळे देशभरात आक्रोश असतानाच राजकीय नेत्यांवरही गंभीर गुन्हे असून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि न्यू इलेक्शन वॉच यांनी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 151 खासदार आणि आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पश्चिम बंगालच्या आमदारांवर सर्वाधिक गुन्हे असल्याची माहिती पुढे आली आहे.
————–