बदलापूर प्रकरणाचे राज्यात पडसाद
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
————-
मलेशिया झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार
पंतप्रधान अन्वर इब्राहिम म्हणाले…
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींबरोबरच्या भेटीनंतर त्यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना वादग्रस्त कथित इस्लामिक धर्मगुरू व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर इब्राहिम अन्वर यांनी मलेशियाची स्पष्ट भूमिका मांडली. अन्वर म्हणाले, झाकीर नाईकविरोधातील सक्षम पुरावे आम्हाला मिळाले तर त्यावर उचित कार्यवाही केली जाईल. परंतु, याबाबतची कोणतीही कार्यवाही करताना दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होता कामा नयेत, अशी आमची भावना आहे”.
————
डॉ. संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे
माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप
कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या धक्कादायक प्रकरणामुळे तेथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चर्चेत आल आहे. या ठिकाणी काम करणारे माजी अधीक्षक यांनी आता माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. डॉक्टर संदीप घोष हे विविध बेकायदेशीर घटनांमध्ये अडकले होते. असं या माजी अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसंच बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय हा संदीप घोष यांचा सेक्रेटरी म्हणून काम करायचा असंही त्यांनी म्हटलं आहे. अख्तर अली हे या रुग्णालय आणि महाविद्यालयात अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.
———
भाजपाला मोठा धक्का
कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
———-
रक्षाबंधनाला एसटीला 121 कोटी रुपयांची ओवाळणी
आर्थिक वर्षातला उत्पन्नाचा रेकॉर्ड तोडला
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून सलग सुट्या आल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रवासी वाढून महामंडळाच्या तिजोरीत 121 कोटींची भर पडली आहे. 17 ते 20 ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट रोजी एका दिवशीच तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठा तोटा झाला होता. त्यानंतर आता हळूहळू एसटी महामंडलाचा गाडा रुळांवर येत आहे.
———–
RSS नेते राम माधव भाजपमध्ये का आणि कसे परतले
काश्मीर निवडणुकीपूर्वी रणनीती किती बदलली
राम माधव यांनी 2014-2020 दरम्यान भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आपली भूमिका बजावली आहे. त्या काळात त्यांना जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि भारतातील इतर ईशान्य राज्यांच्या राजकीय घडामोडींचे प्रभारी बनवण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या राम माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांच्या युतीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
————