भाजपच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त फडणवीस शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘नरकातला स्वर्ग’ या संजय राऊत लिखित पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला.
या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबाबत काही दावे करण्यात आले असून, “आम्ही अजून काही लिहिलं असतं, तर धमाका झाला असता,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले. “ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का?” असा प्रश्न उपस्थित करून फडणवीसांनी राऊतांना डिवचले.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्यात येतील. काही अपवादात्मक ठिकाणी वेगळ्या भूमिका असतील, तरी त्या परस्पर समन्वयातून ठरवण्यात येतील. याबाबत आपण गुरूवारीच काही बाबी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना डीजी कार्यालयाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या कर्जाची प्रकरणे दोन वर्षापासून प्रलंबीत असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की त्यासाठीची आवश्यक परवानगी दिल्या गेली आहे. हा विषय मार्गी लागला असल्याचे ते म्हणाले.