रत्नागिरी(Ratnagiri)14 जुलै :- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही कहर केला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले असून जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरातील १२५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी १२२ मिलिमीटर पाऊस पडला. सर्वाधिक १४६ मिलिमीटर पावसाची नोंद गुहागर तालुक्यात झाली. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १३९ मिलिमीटर, तर मंडणगड तालुक्यात १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे.
अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा खेड तालुक्याला बसला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदीने भरणे नाक्याजवळील पुलाजवळ साडेदहा मीटर उंचीची पातळी गाठली आहे. या नदीची इशारा पातळी पाच मीटर तर धोक्याची पातळी सात मीटरवर आहे. ती ओलांडून नदी वाहत असल्यामुळे खेड शहरात अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. खेड शहरात चिपळूण नाका परिसरातील ४१ तर तळ्याचे वाकण परिसरातील ८४ अशा एकूण १२५ जणांनासुरक्षित सम्राट नगर येथे स्थलांतरिता करण्यात आले आहे.
खेडहून दापोली तसेच मंडणगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. दापोली-मंडणगड रस्त्यावर पालगडच्या पवारवाडीमध्ये पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे छोट्या वाहनांना तेथून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीलाही पूर आला आहे चिपळूणच्या बाजार पुलाजवळ या नदीची इशारा पातळी पाच मीटर तर धोक्याची पातळी सात मीटर आहे. त्या ठिकाणी ५.२४ मीटरवरून नदी वाहत आहे.
राजापूरमध्ये कोदवली नदीलाही पूर आला आहे. तेथील इशारा पातळी ४.९० मीटर तर धोक्याची पातळी ८.१३ मीटर आहे. तेथे कोदवली नदी ५.२० मीटरवरून वाहत आहे.
अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी-करजुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात रस्त्यावर पाणी भरले असल्याने त्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.