लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. दरम्यान आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडेमधल्या काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील. जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे, ते सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.