शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मुंबई (Mumbai) :- राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असा सवाल मविआच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रीपदासाठी (Chief minister) आग्रही आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजपला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, हे दिसून येते. त्यातच, भाजप आमदारांकडूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी दबावगट तयार केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.
राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरुन राजकीय वातावरण तापलं असताना दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली असून शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून दोन दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शिंदेंनी पत्रकार परिषद बोलावल्याने ते आपली नाराजी किंवा मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका मांडतील हे पाहावे लागेल.