देवेंद्र फडणविदांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
मुंबई (Mumbai) :- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी कालच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी कालच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच का बोलत नाहीत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत होती. तसेच एकनाथ शिंदे यांना सव्वा वर्ष तरी मुख्यमंत्रीपद हवं, अशी चर्चा सुरु होती. पण भाजपकडून ते मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या सर्व चर्चांवर आणि याबाबतच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी केलं.
“तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मला लाडका भाऊ हे पद मिळालं. ही मोठी ओळख आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना, माझ्यामुळे किंवा कुणामुळे कुठलीही काही अडचण आहे, असं मनात आणू नका. तुम्ही मदत केली. अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हाला अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे का? असं वाटू देऊ नका. एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.