ऊकाड्याने आणि घामाने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता काही तासांत दिलासा मिळणार आहे. कारण दक्षिण कोकणात काही तासांपासून रेंगाळलेला मान्सून, ७२ तासांत मुंबईत दाखल होईल, अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, आर्द्रतेमधील वाढीमुळे दिवसापेक्षा रात्रीच्या ऊकाड्याने मुंबईकर हैराण झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून रात्रीचा ऊकाडा अधिक असल्याचे चित्र आहे.रविवारी सिंधुदुर्ग जिल्हयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयाला ऑ रेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनची सीमा रेषा पुढे सरकरण्यासाठीचे हवामान अनुकूल आहे. येत्या ७२ तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल. – सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग(Mumbai Regional Meteorological Department)
राज्यात काय ?
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसायटयाचा वारा वाहील आणि पाऊस पडेल.
मुंबईत काय ?
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. सायंकाळी, रात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
वीजा चमकत असताना काय ?
विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. – दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. – विजेच्या खांबांपासून लांब रहावे. – उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.