अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता
धामणगाव, 05 जुलै:- अमरावती जिल्ह्यातील धामणगाव-रेल्वे तालुक्यातील वीरूळ रोंघे गावात चुलत बहिणी असलेल्या दोन बालिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नंदिनी प्रवीण साव आणि चैताली राजेश साव अशी या बालिकांची नावे आहेत. अन्नातील विषबाधेमुळे या बालिकांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
चैताली (वय-11) आणि नंदिनी (वय-10) वीरूळ रोंघे गावातील शाळेत शिकत होत्या. चैताली माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवी आणि नंदिनी प्राथमिक मराठी जि प शाळेत इयत्ता चौथीत होती. नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती दुपारी दोघी सख्ख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे ,ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले दोघीची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आली मात्र अचानक रात्री दोघींची प्रकृती खालावली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या 10 मिनिटाच्या फरकाने दोघींचा मृत्यू झाला. या मृत्यूंमुळे आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन या घटनेमागील शोध घेत आहे दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हा प्रकार घडली असावी असा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.