मुंबई (Mumbai) :- राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे सांगितले जाते. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू, असे सांगितले होते. आता आम्ही सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक (Devendra Fadnavis) आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसर्या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला