मोदी सरकार 3.0चे 100 दिवस
15 लाख कोटींच्या योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी खूप खास असणार आहे. तसेच एनडीए सरकार 3.0 चे 100 दिवस पूर्ण होत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला होता. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही विरोधक रोजगाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या 100 दिवसांवर नजर टाकली तर मोदी सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. याशिवाय रोजगार वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने मोदी सरकारकडे 100 दिवसांचा हिशेब मागितला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, एनडीए सरकार आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात अपयशी ठरत आहे.
————
आतिशी होणार दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव
केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेल्या आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. आतिशी यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल. दुपारी 4:30 वाजता केजरीवाल लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव सांगतील. नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीही याच आठवड्यात होणार आहे.26 आणि 27 सप्टेंबर रोजी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. व 13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘मी प्रामाणिक की बेईमान हे आता जनतेने ठरवावे. जनतेने हा डाग धुवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर मी पुन्हा खुर्चीवर बसेन
———-
बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा
राज्यात गणेशोत्सव सुरु असून पावसानं काहीसा ब्रेक घेतल्यानं बाप्पाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मागील आठवड्यात काही भागात जोरदार सरी होत्या; तर काही भागात पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागतेय. बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी लागणार का यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर विसर्जनाला राज्यात काय स्थिती असेल यावर प्रकाश टाकला आहे. यानुसार सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता आहे.
———–
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो
पंतप्रधान मोदींच स्पष्ट वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा हिशेब जनते समोर मांडला. यावेळी ते म्हणाले, या काळात आपली प्रचंड खिल्ली उडवली गेली, चेष्टा केली गेली, अपमानित केले गेले. मात्र आपण लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत होतो. यामुळे सर्व काही शांतपणे सहन करत होतो. ते अहमदाबादमध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते.पंतप्रधान म्हणाले, देशातील जनतेने 60 वर्षांनंतर एक नवा इतिहास रचला आहे. एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही भारताच्या लोकशाहीतील एक मोठी घटना आहे. मी निवडणूक काळात देशातील जनतेला गॅरंटी दिली होती की, सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यात येतील. गेल्या 100 दिवसांत मी दिवस, रात्र बघितली नाही. 100 दिवसांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली. देशात असो वा परदेशात जेथे जे प्रयत्न करायचे होते, ते केले. कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.
———–
आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो
देवेंद्र फडणवीसांचा इशारा
पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता तर दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. कोणालाही कसलीच भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. वनराज आंदेकर खून प्रकरण त्यानंतर झालेला व्यावसायिकावरील गोळीबार, कोयत्याने वार, गटांमध्ये वाद होऊन मृत्यू अशा घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. याबाबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तत्काळ शोधून काढतो, ठोकून काढतो, जेलमध्ये टाकतो. त्यामुळे पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
———-
महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा
3 टप्प्यात मतदान
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठीची घोषणा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर, दिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच, आपल्याला महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये संधी पाहून, किंवा संधी मिळणार नाही, याचा अंदाज घेऊन उमेदवारांचेही पक्षांतर सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे, विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होतील. सन 1999 नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका एकापेक्षा अधिक टप्प्यात होण्याची यंदा दाट शक्यता आहे. 29 ऑगस्ट रोजी एबीपी माझाने दिलेल्या बातमीवर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे.
वंदे भारतला हिरवा झेडा दाखवण्यासाठी गर्दी
झटापटीत भाजपा आमदार ट्रॅकवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून आग्रा आणि वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आग्रा-वाराणसी रेल्वे मार्गावरील इटावा स्थानकातही प्रवाशांनी वंदे भारतचे स्वागत केले. यावेळी राजकीय नेतेही वंदे भारतच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी इटावा स्थानकात पोहोचले होते. इटावाच्या आमदार सरिता भदौरिया यादेखील वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी स्थानकात पोहोचल्या होत्या. मात्र, त्याचवेळी त्यांच्यासोबत एक अपघात घडला यात या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या त्या दरम्यान भदौरिया यांचा पाय घसरल्याने त्या रेल्वे रूळांवर जाऊन पडल्या. यावेळी ट्रेन तिथेच उभी होती. भाजप आमदार रेल्वे रूळांवर पडल्याने ट्रेनच्या लोको पायलटने हॉर्न वाजवला तर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या नेत्यांनी ट्रेन पुढे जाण्यापासून थांबवण्याचा इशारा दिला.
———-
अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी
उद्या महत्त्वावी बैठक
लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झाला असून जागा वाटपा सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे.
———-
कांद्याचे शेकडो कंटेनर अडकले
नवीन निर्णयाने वाढवली चिंता
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील 550 डॉलरचे किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटविण्याचा निर्णय घेतला. तर कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क 40 टक्क्यांहून 20 टक्के केले. या निर्णयमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा, पण त्यांचा कांदा अजूनही बंदरात आणि सीमावर्ती भागात अडकून पडल्याचे समोर आले आहे. परिणामी शेतकरीच नाही तर व्यापारी सुद्धा चिंताग्रस्त झाले आहे.या नवीन नियमांची प्रतच प्राप्त न झाल्याने कांद्याने भरलेले कंटेनर्स बंदरात आणि सीमावर्ती भागात अडकून पडले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडे या नवीन निर्णयाची प्रतच न आल्याने केंद्र सरकारच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. यापूर्वीच्या गोंधळात या गोंधळाने भर घातली आहे. यापूर्वी निर्यातबंदी घालणे, ती उठवणे, मध्येच निर्यातमूल्य वाढवणे असा गोंधळ पाहायला मिळाला. आता चार दिवसात निर्णयाची माहिती संबंधित विभागाला न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी संतप्त झाले आहेत.