मुंबई (Mumbai) १९ सप्टेंबर :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर कठोरपणे प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि टीका केली आहे की या संकल्पनेत अनेक अस्पष्ट गोष्टी असल्याचे दिसून येते.
राज ठाकरे (Raj thackeray) यांनी सर्वप्रथम याकडे लक्ष वेधले की, ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी अजून याला संसदेची आणि देशातील सर्व राज्यांची मंजुरी मिळणे बाकी आहे. यासाठी राज्यांचा मताधिकार अबाधित राहील याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक म्हणजे, जर एखाद्या राज्यातील सरकार कोसळले किंवा विधानसभा बरखास्त झाली तर त्या राज्यात त्वरित निवडणुका होणार का, की लोकसभेच्या कार्यकाळाच्या समाप्तीपर्यंत वाट पाहावी लागेल? तसेच, जर काही कारणास्तव लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या, तर त्याच वेळी सर्व राज्यांच्या निवडणुका परत होतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या बाबींवर केंद्र सरकारने (Central Government) अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, असेही ठाकरे म्हणाले.
त्यांनी यावरून केंद्राला खडेबोल सुनावत म्हटले की, ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation One election) चांगली कल्पना आहे, पण आधी राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रलंबित निवडणुका घ्या.’ त्यांनी या निवडणुका चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नमूद केले. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सामान्य जनतेला कोणाकडे जायचे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व अधिक आहे कारण त्यांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थानिक निवडणुका त्वरित घेण्याची मागणी त्यांनी केली.राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेवर राजकीय चर्चेला नवीन वळण मिळाले आहे