आरोप व ऑडियो क्लीप दाखवत माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांचा आरोप
बुलढाणा । मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये रस्त्यावरील झाडे तोडणे, काळी माती खोदणे, कच्चा मुरूम खोदणे, त्यानंतर पक्का मुरुम आणून टाकणे, त्यानंतर त्यावर ऐंशी मिलिमीटर खडी पसरविणे, त्यावर मुरूम टाकून परत ४० मिलिमीटर खडी पसरविणे व वर मुरुम टाकून त्यावर दबाई करणे अशी कामे अंदाजपत्रकामध्ये असताना फक्त ४० mm खडीचा एक थर वर टाकण्यात आला. परंतु बील मात्र २५ लाख काढण्यात आले. याचा अर्थ लोकसहभागातून जी कामे आधिच करण्यात आली होती त्याची खोदी बीले काढण्यात आली. अनेक मानक मापदंडे असतांना चिखली विधानसभा मतदारसंघातील रस्ते या मापदंडाप्रमाणे न बांधता ३५० रस्त्यांमध्ये ५६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिली.
पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप दाखवली व हि ऑडिओ क्लिप आमदार श्वेता महाले यांच्या (PA) पीएची असल्याचा आरोप माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे. सोमवार ५ ऑगस्ट रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेसच्या गांधीभवनातील आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की, शेतामधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच शेतीमाल बाजारात पोहचविण्यासाठी व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची नितांत आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ता योजना शेतकऱ्यांसाठी वरदान असतांना चिखली मतदारसंघात मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. ३५० रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असून २५ लाख रुपये एका रस्त्यावर खर्च अपेक्षित असतांना ८ लाख रुपये खर्च करुन थातूरमातूर रस्ते तयार करण्यात आली आहे, या संपूर्ण कामांमध्ये ५६ कोटींचा भ्रष्टाचार झाला असून ऐन पावसाळ्यात पाणंद रस्त्याची वाट बिकट झाल्याची परिस्थिती आहे.
चिखली मतदारसंघातील ३५० पाणंद रस्तांच्या कामात अनियमितता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या मापदंडाप्रमाणे त्यांचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला नसल्याचे विदारक चित्र आहे. रस्त्याची रुंदी पाहिजे तेवढी आढळून येत नाही, रस्त्यावर टाकण्यासाठी खडीचा वापर न करता मोठ्या प्रमाणात मातीचा वापर केल्यामुळे रस्ते चिखलमय झाले असून पाणी निचाऱ्यासाठी व्यवस्थित नाल्यांचे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. शासनाने त्वरीत समिती नेमून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून दोर्षीवर कारवाई करावी, अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी केली आहे.
चिखली विधानसभा मतदार संघात माझ्या पुढाकारातून व तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांच्या सहकार्यातून आम्ही लोकसहभागातून ४०० पाणंद रस्त्याची निर्मीती केली. यासाठी शासन निधी नसतांनाही शेतकऱ्यांनी घेतलेल्या सक्रीय सहभागातून त्यांचे काम पूर्ण झाले. आजही ही रस्ते चांगल्या दर्जाची असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, याचे आत्मीक समाधान वाटते, असेही माजी आ. राहुल बोंद्रे यांनी सांगितले.