मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
मुंबई (Mumbai) :- गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे. मागील काही वर्षांत हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशीही सतत समन्वय साधावा लागत असतो. कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे. तसं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील केंद्राशी समन्वय साधू शकतात, कारण ते आमचे मित्रपक्षच आहेत. मात्र मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं, असा आमचा प्रयत्न असतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणूक निकालात भाजपला विक्रमी १३२ जागांवर विजय झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याचं मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला गेले. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात आम्हाला गृह आणि महसूलसारखी महत्त्वाची खाती मिळावीत, यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यावरून आठवडाभर नाराजी नाट्य देखील रंगले. मात्र उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणकोणती खाती येणार, याबाबत चर्चा रंगत असतानाच फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.