मराठवाड्यात 30 जागा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
मत वाढवण्यासाठी अमित शाहांची खास रणनिती
आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांच्याही अंतर्गत बैठका सातत्याने होत आहेत. या बैठकीत जागावाटप, मतदारसंघ आणि मुख्यमंत्रिपद यावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच अमित शाह यांनी विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितली आहे.
————
मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का
केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. तुम्ही जो नियम लावून लालकृष्ण अडवाणी यांना निवृत्त व्हायला सांगितले, तोच न्याय नरेंद्र मोदी यांना लावणार का, असा प्रश्न केजरीवाल यांनी या पत्रातून उपस्थित केला. अरविंद केजरीवाल यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये एका नेत्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. काही दिवसांनी त्याच नेत्याशी हातमिळवणी करुन भाजपने सरकार स्थापन केले. हे सर्व पाहून तुम्हाला वाईट वाटत नाही का, असा सवालही केजरीवाल यांनी विचारला आहे.
————-
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का
दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटात प्रवेश
मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या डॉ. दिनेश परदेशी यांच्या शिवसेना ठाकरे गटातील पक्षप्रवेशाला आज पूर्णविराम मिळाला. परदेशी यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले. काही दिवसांपूर्वी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ते पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ठाकरेंनी शिंदेंच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी वैजापूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांचा १४ सप्टेंबर रोजी वैजापूर येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त होते. तसेच त्यांच्या समर्थकांकडून तशा पोस्टही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केल्या गेल्या होत्या. मात्र काही कारणामुळे हा पक्ष प्रवेश रखडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.
————–
सरसंघचालकांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न
केजरीवालांनी पाठवले डॉ. मोहन भागवतांना पत्र
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंतप्रधानांची निवृत्ती आणि इतर 5 मुद्यांवर त्यांनी सरसंघचालकांना पत्र पाठवून उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. आपल्या पत्रात केजरीवाल म्हणाले की, देशातील परिस्थितीमुळे आपण चिंतेत आहोत. भाजपचे केंद्र सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे.ते जे प्रश्न विचारत आहेत ते जनतेच्या मनात आहेत. ईडी-सीबीआयच्या लोभ आणि धमक्यांमुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा संघाला हे मान्य आहे का..? असा सवालही केजरीवाल यांनी केला.
———–
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच शरद पवारांचा नाशकातून थेट एल्गार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून कोल्हापूरमध्ये त्यांचा आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला . दुसरीकडे, परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महायुतीला इशारा दिला. राजाभाऊ फड धनंजय मुंडेंविरोधात उतरण्याची शक्यता आहे. सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, तुमच्या भागात सत्तेचा दुरपयोग केला जातो. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो, राजकारण हे समाजकारणाला स्थान देणार पाहिजे. देशात चित्र बदलत आहे, लोकसभा निवडणूक आधी सुद्धा ते दिसलं. प्रधानमंत्री सांगत होते 400 पार निवडून येणार, पण आले किती त्यांचे खासदार? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
———–
भाजपला मोठा धक्का
पिचड पिता-पुत्रानं घेतली थोरल्या पवारांची भेट
विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या हालचालींना वेग दिला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. दोघेही पिता-पुत्र पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत आहे. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे
———-
आम्ही जो निधी मागतो त्यावर…
सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यांना निधीतून वगळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत.
————-
मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित
मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा
आमरण उपोषणामुळं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत प्रचंड खालावली आहे. सार्थकांच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. गेल्या नऊ दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांची तब्बेत खालावत चालली आहे. तब्येत खालवत असतानाच आज मनोज जरांगे यांना मध्यरात्री सहकाऱ्यांच्या आग्रहाने सलाईन लावण्यात आले आहे. आंदोलन स्थळी गावकऱ्यांनी आंदोलकांनी उपचार घेण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर रात्री 12 वाजता डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले.मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
———–
जेपीसीला 1 कोटींहून अधिक ईमेल
प्रचंड सूचनांच्या मागे षडयंत्र असल्याचा दावा
वक्फ बोर्ड सुधारणा विधयेकाबाबत स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे 1 कोटीहून अधिक ईमेल प्राप्त झालेत. तसेच लिखित सूचनाही मिळाल्या आहेत. या सूचनांच्या मागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा दावा जेपीसीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी केला. यासंदर्भात दुबे यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना पत्र पाठवले आहे. तसेच गृहमंत्रालयाने या सूचनांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.निशिकांत दुबे यांनी जगदंबिका पाल यांना लिहिलेल्या पत्रात विनंती केली आहे की, या गंभीर चिंता लक्षात घेता, जेपीसीला मिळालेल्या सामग्रीची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाला परवानगी द्यावी. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत आलेल्या सूचनांमध्ये कट्टरपंथी संघटना, झाकीर नाईकसारख्या व्यक्ती, आयएसआय आणि चीनसारख्या परदेशी शक्तींची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पारदर्शकता ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून तपासणी करून त्याचा रिपोर्ट जेपीसी समोर ठेवावा असे त्यांनी म्हटले आहे.