मुंबई (Mumbai) :- दक्षिणेकडून उत्तरेकडे सरसावलेल्या मान्सूनने उत्तरेकडील राज्यांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार उडाला असून भूस्खलनामुळे 129 रस्त्यांवरील वाहनांचे वाहतूक थांबली आहे. बिहार उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश व राजस्थानसारख्या राज्यांना पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही पुढील 4 दिवस दमदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे हायअलर्ट देण्यात आले आहेत.
राज्यभरात आज मराठवाड्यासह पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Weather) जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालन्यासह परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली भागात पाऊस झाला. विदर्भात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आज संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यातही येलो अलर्ट आहे. पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट (Heavy Rain) देण्यात आला आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.