उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अक्षय यांच्या झडापट झाल्यानंतर अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे.
बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटले. तसेच, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही निकम यांनी सांगितले