मुंबई (Mumbai) :- मुंबईजवळील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांनी जीव गमावला. सकाळी सुमारे ९.२० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी दरवाजात लटकत उभे होते. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या लोकलची त्यांना धडक बसली. याचा जोर इतका होता की, यामुळे आठ प्रवासी खाली फेकले गेले. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान गेल्या २० वर्षांत मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये ५१,००० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, असे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २२,४८१ प्रवाशांचा, तर मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकल रेल्वे गाड्यांमध्ये अपघातांमुळे होणारी मृत्युची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आणून देणाऱ्या यतीन जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ही माहिती सादर केली.
विरार येथील रहिवासी यतीन जाधव यांनी न्यायालयात सांगितले होते की, ते पश्चिम रेल्वे व्यवस्थापित करत असलेल्या मार्गावरून दररोज प्रवास करतात. याचिकाकर्त्याच्या वकिलाने असे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते की, महाविद्यालयात किंवा कामासाठी जाणाऱ्या अंदाजे पाच प्रवाशांचा दररोज मृत्यू होतो.
यावर युक्तिवाद करताना पश्चिम रेल्वेच्या वकिलांनी म्हटले होते की, “लोकल अपघातांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या आणि जखमींच्या संख्येत घट झाली आहे. २०१६ मध्ये लोकल अपघांमुळे १,०८४ मृत्यू आणि १,५१७ प्रवाशी जखमी झाले होते, तर २०२३ मध्ये ९३६ प्रवाशी मृत्युमुखी पडले होते तर ९८४ जखमी झाले होते.