नागपुरातील तीन वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र शासनाचे निर्देश
नागपूर (Nagpur) : – प्राण्यांमध्ये एव्हियन फ्ल्यू विषाणूचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे उद्यापासून राज्यातील सर्व प्राणी संग्रहालये काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. नागपुरातील गोरेवाडा येथील तीन वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय सध्या सोमवारी नियमित सुट्टीमुळे बंद आहे. महाराजबागच्या प्राण्यांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र, गोरेवाडा येथील घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्राणी संग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
डॉ. सुनील बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणी संग्रहालय, यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालये तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत आज सायंकाळपर्यंत स्पष्ट सूचना येण्याची शक्यता आहे.”
संपूर्ण राज्यभरात प्राणी संग्रहालयांसाठी ही खबरदारी लागू केली जाणार आहे. प्राण्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.