संसदेत राहुल गांधींचे 46 मिनिटांचे भाषण
अदानी-अंबानींवर गदारोळ
सोमवारी (29 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. राहुल गांधी दुपारी 2 वाजता लोकसभेत पोहोचले. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी चक्रव्यूहाची कहाणी सांगितली. त्यावर ओम बिर्ला यांनी त्यांना अडवले. त्यावरून गदारोळ झाला. या गदारोळानंतर राहुल यांनी अर्थसंकल्पावर आपली भूमिका मांडली. राहुल यांनी अग्निवीर आणि पेपरफुटीसारखे मुद्दे उपस्थित केले. तसेच शेतकऱ्यांबाबत ते म्हणाले की, सरकारने तीन काळे कायदे आणले. यापूर्वी लोकसभेत कामकाजादरम्यान दिल्ली कोचिंग अपघाताचा मुद्दा उपस्थित झाला होता. दिल्ली सरकारच्या दुर्लक्षावर भाजप, काँग्रेस आणि सपाने प्रश्न उपस्थित केले
———
अरविंद केजरीवाल हेच मुख्य सूत्रधार
सीबीआयचे न्यायालयात आरोपपत्र दाखल
ईडीनंतर आता सीबीआयनेही दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. एका महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल. तसेच, अरविंद केजरीवाल हेच उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातील केंद्रीय व्यक्ती म्हणजेच “सूत्रधार” असे म्हटले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
———-
महाविकास आघाडीला भारत जोडो अभियानाची भक्कम साथ
महायुतीची चिंता वाढवणार
भारत जोडो अभियानाने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघांची वैचारिक मशागत करण्याची जबाबदारी ही भारत जोडो अभियानाने खांद्यावर घेतली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातही भारत जोडो अभियानाने देश पातळीवर इंडिया आघाडीसाठी काम केले होते. यात सुमारे 78 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या विजयात पडद्यामागून भारत जोडो अभियानानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यात 150 तर विदर्भात 45 मतदारसंघात भारत जोडो अभियान आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला भारत जोडो अभियानाची मिळालेली भक्कम साथ ही राज्यात महायुतीची चिंता वाढवणार का? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल
निकालानंतर रंगली होती चर्चा
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदार तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना मराठा आरक्षणावरुन एकच प्रश्न विचारला आहे. मागील बऱ्याच काळापासून शरद पवारांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अनेक नेत्यांकडून केली जात असतानाच शरद पवारांचा उल्लेख करत पंकजा मुंडेंनी त्यांना याच विषयावरुन एक प्रश्न विचारला आहे.
———
बच्चू कडू यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर
सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचे अनोखे स्वागत
महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे. मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा जास्त भावी मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांचे देखील भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहे
————
आदित्य ठाकरे यांचा मोठा आरोप
शिंदे सरकारची त्या 5 कंत्राटदारांवर मेहेरनजर
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार आणि मुंबईचे पालिका आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आमचे सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आजी, माजी आयुक्त असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदाराना मोठे काम देण्यात आले. पालिका, एमएमआरडीए हे खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना पैसे देत आहे. पण, कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. दोन्ही बजेटमध्ये शून्य पैसे दिले. मग, कंत्राटदारांवर उधळपट्टी का करत आहात, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.