चंद्रपूर 9 जुलै :- सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली येथे दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रकरणे या विशेष लोक अदालतीत ठेवता येतील. तसेच इच्छुकांना यात प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभागी होता येईल अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांनी दिली.
यासंदर्भात समृद्धी भीष्म यांनी सांगितले की, विशेष लोक अदालतीमध्ये साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत
मिळते.जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन समृध्दी भीष्म यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन
