नागपूर (Nagpur) :- सार्वजनिक कार्यक्रमात आज सर्वांसमोर बोलू इच्छितो की, येणाऱ्या काळात भारतातील सर्वोत्तम कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट राहणार आहे. कारण या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे कर्मठ लोक उभे आहेत आणि त्यांचात सेवेचा भाव आहे. देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर दोघांबद्दल ही बोलू इच्छितो, दोघांच्या कुटुंबात कॅन्सरमुळे दुःख आले होते, कुटुंबाचे नुकसान झाले होते. मात्र दोघांनी त्यांच्या व्यक्तिगत दुःख आणि वेदनेला सार्वजनिक सेवेमध्ये परावर्तित केलं आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी रूपांतरित केलं. असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात “नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट” मध्ये “स्वस्ति निवास पंथागार” या कॅन्सर पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या निवासगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून फडणवीसांनी त्यांच्या वडिलांच्या कॅन्सर आजाराने मृत्यूनंतर नागपूरसह मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांसाठी एक चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्याचा स्वप्न पाहिलं होतं. 2012 पासून टप्प्याटप्प्याने कॅन्सर रुग्णालयाचं स्वप्न पूर्ण होत गेलं आणि एप्रिल 2023 पासून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपुरात पूर्ण क्षमतेने कार्यरत झालंय. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा बनले आहे, मात्र जेव्हा फडणवीस यांनी कॅन्सर इन्स्टिट्यूटचं (National Cancer Institute) काम सुरू केलं, तेव्हा ते काहीच नव्हते. तरी त्यांनी सुरुवात केली. अशा सेवा कार्यांना देवाचा आणि समाजाचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा वटवृक्ष इथे उभा आहे आणि हजारो गरजूंच्या जीवनातून दुःख दूर करत आहे. पश्चिमी देशात जेव्हा रुग्ण आजारी पडतात, तेव्हा त्याला रुग्णालयाच्या भरवशावर सोडून दिलं जातं. मात्र आपल्याकडे जेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याच्या सेवेमध्ये योगदान देत असतं. या स्वस्ति निवासच्या माध्यमातून भारतातील सर्व रुग्णालयांसाठी एक नवा आदर्श देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे टीमने समोर ठेवला आहे. या स्वस्तिनिवासच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांची संवेदना कायम ठेवण्याचा काम करेल. असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.