कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात
यवतमाळ (Yavatmal) :- पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर कमी दराने कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे. खाजगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून, अनेक ठिकाणी खासगी खरेदीत शेतकर्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांची कापूस कोंडी होताना दिसत आहे. शासनाने कापसाची एमएसपी यावर्षी 7521 रुपये प्रतिक्विंटल इतकी जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी कापूस विक्रीसाठी नेत आहेत त्यावेळेस त्यांना साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटल ने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयचे 24 केंद्र मंजूर झाले असून केवळ 14 केंद्रावरती शेतकर्यांचा कापूस खरेदी सुरू आहे. यातही शेतकर्यांच्या कापसामध्ये ओलावा जास्त असल्याचे कारण देऊन 7 हजार 200 ते 7 हजार 400 प्रतिक्विंटल दराने या दराने कापूस खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांना मिळणारा हा दर लागवड खर्चाच्या तुलनेत ही कमी असल्याने किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर शासनाने द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
सरकारकडून सोयाबीन पिकासाठी 4892 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. त्यासाठी सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र उत्पादन आणि खरेदी याचा ताळमेळ लागताना दिसत नाही. शिवाय प्रशासनाच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना हमिभावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून सोयाबीन ओलावा 15 टक्के असेल तरी सोयाबीन खरेदी करावं, असं परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात 12 टक्क्यापर्यंत ओलावा असेल तरच सरकारी खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी केली जात आहे.