मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सूचना
मुंबई (Mumbai) :- मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार, मशिदींसह सर्व प्रार्थनास्थळांनी ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्र सरकार भोंग्यांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला.
मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळी भोंगे बसवण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. तसेच, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे बंद असणे बंधनकारक आहे. दिवसाच्या वेळेत (सकाळी 6 ते रात्री 10) ध्वनी मर्यादा 55 डेसिबल आणि रात्रीच्या वेळेत 44 डेसिबल इतकी असावी.
कायद्यानुसार, यापेक्षा अधिक आवाज असलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांची नोंद घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती द्यायची आहे. मात्र, सध्याच्या घडीला हे नियम प्रभावीपणे लागू होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.