मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटर लांबीचा असणार समृद्धी महामार्ग सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) दोन दिवसांपूर्वी घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २९ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ते वनोजा टोल नाका या दरम्यान एक दोन नव्हे तब्बल ५० वाहने पंक्चर झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर पडलेल्या लोखंडी फलकावरून वाहने गेल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही घटना चुकून घडली आहे की कोणी मुद्दाम हा प्रकार केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धक्कादायक बाब म्हणजे एक्स्प्रेस हायवे असल्याने आसपास मदतीलाही कोणी नव्हते. भरमसाठ टोल देऊनही कोणी मदतीला येत नव्हते. यामुळे अनेक प्रवासी रात्रभर महामार्गावरच अडकले होते. हा पत्रा अपाघाती पडला की मुद्दामहून फेकण्यात आला याची चौकशी केली जात आहे.
समृद्धीवर सुरुवातीपासून टायर फुटून अनेक भीषण अपघात झालेले आहेत. तसेच लक्झरी बसेसना आगीही लागण्याचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे आधीच हा महामार्ग जीवघेणा ठरत असताना आता पत्राच रस्त्यावर पडून वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने व रात्रभर मदतही न मिळाल्याने या महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.