चंद्रपूर (Chandrapur) 30 नोव्हेंबर :- राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली असून विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारासह सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, जिल्ह्यात पारा १३ च्या आसपास आला आहे.
शनिवारी सकाळी विदर्भातील विदर्भात अकोला येथे १२.७ सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. बुलढाणा १३ नागपूर १३.६, तर चंद्रपूर १४.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत असून या वादळाचा प्रभाव प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, केरळ या राज्यांत जाणवणार आहे. या चक्रीवादळामुळे राज्यावर फारसा काही परिमाण होणार नसला तरी हवेतील आर्द्रता कमी झाली असून कोरड्या हवामान तयार झाले आहे. यामुळे दिवसा व रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री तसेच दिवसा देखील गारठा वाढला आहे.
सध्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यात फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्र व मध्य भारतातील हवेतील आर्द्रता कमी होऊ होऊन तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रात्री व पहाटेच्या तापमानात मोठ घट होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.