गोंदिया, २६ मे,: गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत दोन प्लॅस्टिक पाणी टाकी लावण्यात आल्या होत्या. ही पाणी टाकी निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड गावकऱ्यांची आधीपासूनच होती. दरम्यान, ही पाणी टाकी कोसळली. त्यामुळे पाणी टाकीच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पांढरी येथे सोलवर आधारित पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पंप बसवून पाणी टाकी लावण्यात आल्या होत्या. दरम्यान, यापैकी एक पाणी टाकी पाण्याने भरलेली टाकी अचानक फुटून खाली कोसळली. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा लावलेली पाणी टाकी कोसळली होती. शासनाने पांढरी येथील या योजनेकरिता ९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, यानंतरही निकृष्ट दर्जाची पाणी टाकी वापरल्याने ती अल्पावधीत कोसळून फुटली आहे. दोनदा असाच प्रकार घडूनही संबंधित विभाग याची दखल घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.