3 पुरुषासह एक महिला अन् एका लहान मुलाचा समावेश
उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 6 जण बुडाले होते. यापैकी 5 जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान गौरव डोंगरे यांचा मृतदेह अजून सापडला नाही.
उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवार (ता.21) रोजी प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेले 6 सहा प्रवाशांपैकी 5 प्रवाशांचे मृतदेह तब्बल 46 तासानंतर नैसर्गिकरित्या(Naturally)पाण्यावर तरंगत वर आले असून अद्यापही एक जण बेपत्ता आहेत. दरम्यान मृतदेहाबाबत माहिती मिळतात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे गावात राहणारे गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे) त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव (वय 25वर्षे ) लहान मुलगा समर्थ गोकुळ जाधव (वय दिड वर्ष), मुलगी वैभवी गोकुळ जाधव (वय 3) हे संपूर्ण कुटुंब तसेच सोलापूर येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचे पुत्र गौरव धनंजय डोंगरे (वय 24) व बोट चालक अनुराग अवघडे (वय 26) असे सात जण कुगाव वरून कळाशी कडे निघाले प्रवास करीत बोट नदीपात्रातील ऐतिहासिक इनामदार वाड्याच्या परिसरात आले असताना अचानक सुटलेला जोरदार वादळाचा तडाखा आणि वळवाचा तुरळ पाऊस यामध्ये ही बोट उलटली.