ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अभेद्य राखलेला हा गड यापुढेही अभेद्य राखण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
नवी मुंबईतील कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली येथे काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. स्थानिक मतदारांनी जागोजागी मोठ्या उत्साहात फुले उधळत, फटाके वाजवत मोठ्या जल्लोषात स्वागत केले. नवी मुंबईकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयाची जणू ग्वाहीच देत होता. काहीही झाले तरीही विजयश्री खेचून आणायचीच हा विश्वास या प्रचार रेलीद्वारे व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य शासनाने गेल्या २ वर्षात तर आणि केंद्र शासनाने गेल्या १० वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक पार पडत आहे. देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी अशी ही निवडणूक असून या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अटल सेतू, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, ऐरोली-काटई बोगदा, नवी मुंबई मेट्रो, नवीन विमानतळ यामुळे नवी मुंबई शहराचा चेहरामोहरा आगामी काळात पूर्णपणे बदलणार असून एक सुनियोजित आणि सर्व सुविधांनी संपन्न असे शहर म्हणून ते ओळखले जाणार आहे. त्यामुळे विकासाचा वेग कायम राखायचा असेल तर महायुतीला पर्याय नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली शिवसेना आज काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यांना प्रचारासाठी लागतो आहे. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसची हे पाठराखण करत आहेत. तर महाराष्ट्र भवनाला विरोध करणाऱ्या फारूख अब्दुल्लाच्या मांडीला मांडी लावून हे बसले आहेत. त्यामुळे राम मंदिर उभारणाऱ्या, ३७० कलम हटवणाऱ्या तसेच सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचंड बहुमताने निवडून लोकसभेत पाठवावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ भाजप नेते, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार रवींद्र फाटक, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, माजी नगरसेवक ममित चौगुले तसेच महायुतीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.