गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणुन ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या कडक उन्हामुळे प्रमुख जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात ४२ अंशांवर पारा पोहचला आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणी पातळी कमी असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना पाणी मिळत नाही. आणखी मान्सून लांबला तर भीषण पाणी समस्या गोंदिया जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 4 मोठी जलाशय आहेत. त्यापैकी पुजारीटोला धरणामध्ये सध्याच्या घडीला 42.52% जलसाठा शिल्लक आहे. तर शिरपूर जलाशयात 9. 19% जलसाठा असून कालीसराळ या जलाशयात फक्त पाण्याचा मृत साठा शिल्लक असून इटियाडोह या महत्वपूर्ण प्रकल्पामध्ये 26. 30 टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. तर एकूण सात मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात असून या सातही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 30 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे.