सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. राज्य पातळीवरचे नेतेही ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालत आहेत. स्थानिक पातळीवर त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक एकहाती लढवण्याची तयारी चालू केली आहे. तर राज्यपातळीवर युती आणि आघाडी यावरही विचार केला जात आहे. दरम्यान, महायुतीतील घटकपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढवणार की तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोरे जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच आत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी याच युतीवर मोठं भाष्य केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये १० लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनियर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असं अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.