छत्रपतींच्या गड-किल्ल्यांच्या पर्यटनासाठी खास रेल्वे सेवेची सुरुवात
मुंबई (Mumbai) :- राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’ सुरू करण्यात आलेली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना भेट देणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे.”
दरम्यान, आज सुरू झालेल्या पहिल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) भारत गौरव पर्यटन ट्रेन’मधून ७०० हून अधिक पर्यटक प्रवास करणार आहेत. यामध्ये राज्यातील गडचिरोली ते गडहिंग्लजपर्यंतच्या विविध भागांतील लोकांचा समावेश आहे. याचबरोबर या विशेष रेल्वेच्या पहिल्या फेरीत १५० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तसेच, एकूण प्रवाशांपैकी ८० टक्के प्रवासी ४० वर्षांखालील आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली आहे.