महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्यावरून राज्यातील महायुती सरकारवर सातत्याने टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की देशाने वर्षभरात आकर्षित केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. तसेच, गेल्या वर्षी महाराष्ट्राने आकर्षित केलेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा यंदा राज्यात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे.
महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पुन्हा एकदा देशात पुन्हा अव्वल ठरल्याची बातमी देत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च २०२५) परकीय गुंतवणुकीबाबतची आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली आहे. त्यानुसार या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही ४,२१,९२९ कोटी रुपये इतकी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात गेल्या वर्षात झालेल्या गुंतवणुकीशी तुलना केली तर यावर्षी त्यापेक्षा ३२ टक्के अधिक गुंतवणूक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या ९ महिन्यातच मोडला होता. या विक्रमी कामगिरीसाठी मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.