अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील ग्रामस्थांनी आज पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालय दर्यापूर या ठिकाणी धडक मोर्चा काढला. या दरम्यान ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना चांगले धारेवर धरले होते. तर काही वेळ कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले होते.
मागील गेल्या चार वर्षापासून सामदा या गावांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालय या ठिकाणी वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित निवेदनाची दखल अधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आली नाही. त्यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना व जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. संबंधित ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळे आज सामदा येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिला सह जीवन प्राधिकरण कार्यालयात येथे धडक मोर्चा काढला.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना चांगले धारेवर धरले. यादरम्यान कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले होते. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर संबंधित गावकऱ्यांना तीन दिवसात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी पत्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभाग अभियंता यांनी ग्रामस्थांना दिले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले .