पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून दिलेल्या प्रत्युत्तरनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरवरच होईल. यामध्ये दोन्ही देशांमधील चर्चेत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे विधान केले.
डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) पुढे बोलताना म्हणाले की, “पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. हे वर्षानुवर्षे राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.”
यावेळी सिंधू जल कराराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “सिंधू जल करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत तो स्थगित राहील. काश्मीरवर चर्चा करण्यासाखी एकमेव गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणे ही आहे. आम्ही त्या चर्चेसाठी कायम तयार आहोत.”