भारतीय वनडे (Indian ODI) संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नुकतंच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहितनं गेल्या वर्षीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दोन फॉरमॅटला अलविदा केल्यानंतर, रोहित आता टीम इंडियासाठी फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल. विशेष म्हणजे टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असताना हिटमननं निवृत्तीची घोषणा केली.
रोहितच्या (Rohit Sharma) निवृत्तीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohali) कसोटीतून निवृत्तीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नं त्यांच्या एका वृत्तात हा दावा केला आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बीसीसीआयला सांगितलं आहे की तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छित आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे.
त्यानं आपलं मन बनवलं आहे आणि तो कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणणार असल्याचं बोर्डाला कळवलं आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्यानं बीसीसीआयनं त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. त्यानं अद्याप या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही.