भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी देशविरोधी गोष्टी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राजधानी लखनऊमधील एका शाळेत मुख्यमंत्र्यांनी अशी परिस्थिती का उद्भवली? असा सवाल उपस्थित केला आहे.
लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS) मध्ये आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपले सर्वांचे लक्ष्य ‘नेशन फर्स्ट’ म्हणजेच ‘राष्ट्र प्रथम’ असले पाहिजे. हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय असले पाहिजे. सध्या देशात जे घडत आहे ते पाहताना मी कधी कधी सोशल मीडियावर नजर टाकतो आणि मला काही ट्विट्स दिसतात, जे देशविरोधी आहेत आणि आपल्या सैन्याच्या इच्छाशक्तीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. ही अशी परिस्थिती का निर्माण झाली? ही भूमी आपल्या सगळ्यांची आई आहे आणि पंतप्रधानांनीही ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, जीवन एकपक्षीय असू शकत नाही. विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील आपलं स्थान निर्माण करू शकतात. कार्यक्रमाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट देखील केली. त्यांनी लिहिलं की, “लखनऊ येथे आयोजित ‘शिक्षक आभार समारंभा’त सहभागी झालो. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचं उत्साहवर्धन केलं. मला पूर्ण विश्वास आहे की शिक्षणाला संस्कार, राष्ट्रभक्ती आणि भारताच्या परंपरांशी जोडत भारतीय संस्कृतीला बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन पुढे जाऊ,” असे त्यांनी म्हटले.