पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध जगाने नोंदवला. त्यानंतर काही कालावधीतच या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळलं होतं. ज्यानंतर भारताने ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर आता या कारवाईचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केलं आहे.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) भारत सरकारच्या नेतृत्वात आणि सैन्य दलांनी उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. जे क्रूर हत्याकांड दहशतवाद्यांनी घडवून आणलं आणि भ्याड हल्ला केला तेव्हापासूनच देशवासियांच्या मनात पीडित कुटुंबांना, माता भगिनींना न्याय मिळावा ही देशभावना होती. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारचं आणि सैन्य दलांचं अभिनंदन करतो
सरकारने आणि सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवल्याने संपूर्ण देशाची हिंमत वाढली आहे आणि त्यांची छाती अभिमानाने फुलली आहे. पाकिस्तानने जे केलं त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी दिलेलं उत्तर ही महत्त्वाची आणि अपरिहार्य कारवाई होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशा संकट काळात आम्ही तन-मन-धनासह देशाच्या सरकारच्या आणि सैन्य दलांच्या पाठिशी आहोत. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांचा विचार न करता हल्ले केले जात आहेत. सीमा भाग आणि धार्मिक स्थळं यांना लक्ष्य केलं जातं आहे. या घटनांमध्ये ज्यांना प्राण गमावावा लागला त्यांच्या प्रति आमच्या सहवेदना आहेत. आम्ही त्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत. असंही मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे.