भारतावर एअर स्ट्राईक करुन नसते संकट ओढावून घेतलेल्या पाकिस्तानची अवस्था आता बिकट झालेली दिसत आहे. अगोदरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan) रसातळाला गेली असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे साहस केले होते. पाकिस्तानने गुरुवारी भारतातील 15 ठिकाणी क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence) हे सर्व हल्ले परतावून लावले होते. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून ड्रोन हल्ले केले होते. तर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी पाकिस्तानचे व्यापारी केंद्र असलेले कराची बंदर उद्धवस्त केले होते. या एका हल्ल्यानेच अगोदरच कंगाल असलेल्या पाकिस्तानचे कंबरडे पार मोडले आहे.
त्यामुळे पाकिस्ताने आता जगातील अन्य देशांकडे आर्थिक मदतीसाठी कटोरा पुढे केला आहे. पाकिस्तानच्या अर्थविभागाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये पाकिस्तानने आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे. शत्रूने हल्ला केल्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड नुकसान (Drone Attack) झाले आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील भांडवली बाजारही कोसळला आहे. अगोदरच दरिद्री असलेला पाकिस्तान भारतीय सैन्याच्या एका तडाख्यामुळे आणखीनच कंगाल झाला आहे.
पाकिस्तानला हे युद्ध सुरु ठेवायचे असेल तर शस्त्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आणि अन्य गोष्टींसाठी पैसा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एफटीएफ यांच्यासह अन्य देशांकडे कर्जाऊ पैसे देण्याची मागणी केली आहे. मात्र, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल रात्रीपासून अनेक देशांशी चर्चा सुरु केली आहे. आपले राजनैतिक कसब पणाला लावून एस. जयशंकर हे पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानने आयएमएफकडे 1.4 अब्ज डॉलर्स इतक्या कर्जाची मागणी केली आहे. पाकिस्तानला हे कर्ज मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री केलेल्या प्रतिहल्ल्यात ड्रोन विमानांनी लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर हल्ले करण्यात आले. या शहरांमध्ये ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सैन्याने पाकिस्तानची 3 ते 4 लढाऊ विमाने, 50 क्षेपणास्त्रं आणि 60 ड्रोन पाडली आहेत. याशिवाय, लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमही भारताने नष्ट केली आहे.