सोलापूर (Solapur)16 फेब्रुवारी :- नियमित पाण्याच्या प्रतीक्षेतील सोलापूरकरांना दररोज पाणी मिळावे, यासाठी सध्या ८९२ कोटींचा खर्च करून सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. मार्चअखेर जलवाहिनीचे काम पूर्ण होईल, तरीपण सोलापूरकरांना नियमित पाण्यासाठी तब्बल चार ते पाच वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प, शहरांतर्गत जलवाहिनी, नवे जलकुंभ उभारल्याशिवाय नियमित पाणीपुरवठा शक्य नसल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.सध्या शहरातील गावठाण भागाला चार तर हद्दवाढ भागाला (एमबीआरवरील भाग) पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेचा आहे.
मागील २५ ते २८ वर्षांपासून या नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने एकदाच पाणी साठवून ठेवावे लागते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरासमोर पाणी भरलेले प्लास्टिक पिंप दिसतात. १७० एमएलडीची समांतर जलवाहिनी झाल्यावर तरी नियमित पाणी मिळेल, या आशेवरील सोलापूरकरांची कामे पूर्ण झाल्यानंतरही निराशाच होणार आहे. पाकणी येथे वन विभागाच्या जागेत महापालिकेला जलशुद्धीकरण केंद्र उभारावे लागणार आहे. याशिवाय शहरांतर्गत जुनाट जलवाहिनी बदलावी लागणार असून, काही भागात नवे जलकुंभ उभारावे लागणार आहेत.