अमरावती (Amaravati) 4 फेब्रुवारी :-
उन्हाळा सुरू झाला असला, तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली आहे. अशातच मेळघाटातील माळरानावर ठिकठिकाणी पळस फुले उधळताना दिसत आहेत.पळस म्हणजे पलाश वृक्ष रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचेच लक्ष वेधून घेतेय. अचलपूर तालुक्यातील डोंगराळ भागात बहरलेली पळसाची झाडे अनेकांना मोहून टाकत आहेत. उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडेपाहवयास मिळतात. अशावेळी उन्हाळ्यातही काही झाडे बहरत असताना पळस लक्ष वेधून घेतो. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. पळसाला जशी पिवळी आणि दुर्मिळ पांढरी फुलेही आढळतात. पण, या सुंदर फुलांना गंध नाही. परंतु, पळस फुलला की संपूर्ण जंगल रंगांनी न्हाऊन निघते.
पळसाच्या फुलातील मध वेचण्यासाठी असंख्य पक्षी झाडावर येतात. पळसाच्या फुलांपासून रंगदेखील बनिवला जातो. तसेच ग्रामीण भागात पूर्वी पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठीही केला जायचा. निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ घालते. विशेष म्हणजे, प्राचीन काळापासून पळसाचा औषधशास्त्रात उपयोग होतो. पळसाला पाने तीन अशी मराठीत म्हणं आहे. पण त्या पानांनादेखील त्रिदेवाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पळसाच्या बारीक फांद्या यज्ञात समिधा म्हणून वापरतात. पळसाच्या फुलांना पाण्यात सोडले की त्याचा नैसर्गिक भगवा रंग तयार होतो. या रंगानेच रंगपंचमी ग्रामीण भागात साजरी होते. शिवाय पळसाच्या बियांचे तेल त्वचेकरिता, डिक शक्तीकरिता, पाने पत्रावळीकरिता, तर पळसाचे लाकूड बांधकामात वापरण्यात येते. पूर्वीच्या काळी रंगपंचमीच्या दिवशी फुलांचा रंगदेखील वापरला जायचा. बाजारात विविध कृत्रिम रंग आल्यामुळे आता या झाडाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.