नवी दिल्ली (New Delhi) 23 जानेवारी :- भारतातील मतदारांची संख्या आता 99.1 कोटी झाली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या 96.88 कोटी होती. राष्ट्रीय मतदार दिनापूर्वी जारी केलेल्या निवेदनात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील 21.7 कोटी तरुण मतदार आहेत.मतदारांच्या लिंग गुणोत्तरात 948 वरून 6 अंकांनी वाढ होऊन आता ते 954 पर्यंत गेले आहे.
देशात 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यानिमित्ताने दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. गेल्या 7 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार म्हणाले होते की, भारत लवकरच एक अब्जाहून अधिक मतदारांचा नवा विक्रम प्रस्थापित करेल. आपण 99 कोटी मतदारांचा आकडा ओलांडत असून लवकरच एक अब्ज मतदारांचा देश बनणार आहोत, जो मतदानात आणखी एक विक्रम असेल असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते. देशातील मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या सुमारे 48 कोटी असेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.