सोलापूर (Solapur) 21 जानेवारी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो, असा निकष आहे. तरीपण, या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता ६५ वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थींना, यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास ७४ हजार लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाख पाच हजारांहून अधिक लाभार्थी घेतात.
दरमहा त्या लाभार्थींसाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी लागतो. मात्र, संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही. याशिवाय डिसेंबर व जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही. निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो. त्यासोबत आता लाभार्थींना स्वयंघोषणापत्र देखील द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, या बाबी त्यात समाविष्ट आहेत.