Saturday, June 21, 2025
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related Posts

ज्ञानसाधिकेचे शंकराचार्यांकडूनकौतुक…!

नागपूर,16 डिसेंबर : नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी बातमी आहे. नागपुरातील सेवानिवृत्त बँकर आणि लेखिका विशाखा पाठक यांनी कर्नाटकातील शृंगेरी पीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या भगवत गीता पठन परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पाठक यांनी केलेल्या श्लोकांच्या सस्वर उच्चारणाला थेट शंकराचार्यांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. गेल्या 8 डिसेंबर रोजी कर्नाटकातील शृंगेरी पीठातर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.

लहानपणापासून दुर्मिळ प्रकारचा मधुमेहाशी दोन हात करत जीवनाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या विशाखा पाठक यांनी अध्यात्म, छंद आणि साधना यांची सांगड घालत भगवत गीता कंठस्थ केली आहे. शाळेत शिकताना स्कोअरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृतची निवड करणे आणि परीक्षेत अपेक्षित गुण प्राप्त झाल्यावर सर्व सोईस्कर विसरणे हा हल्लीचा एज्युकेशन पॅटर्न बनला असताना. कसलेही प्रलोभन मनात न ठेवता आपण हे करू शकतो, आपण हे करायला हवे या दोन वाक्यांना मनाचा निर्धार बनवून ध्येयप्राप्ती होऊ शकते हे विशाखा पाठक यांनी नव्याने अधोरेखित केले आहे. यातूनच त्यांनी 8 डिसेंबर 2024 रोजी शृंगेरी पीठातर्फे घेतली जाणारी गीता पठनाची परीक्षा वयाच्या 70 व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. सोबतच 21 हजारांचे प्रथम पारितोषिक आणि शंकराचार्यांकडून अमूल्य अशी कौतुकाची थाप मिळवली आहे.

गीतेतील सर्व 18 अध्याय आणि त्यातील 700 श्लोक त्यांना तोंडपाठ आहेत. विशेष म्हणजे गीतेतील या श्लोकांमधले 574 भगवान श्रीकृष्ण, 84 अर्जुन, 41 श्लोक संजय आणि एक श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी असल्याचे जेव्हा त्या सांगतात तेव्हा विशाखाताईंनी गीता केवळ कंठस्थ नव्हे तर आत्मसात केल्याचे लक्षात येते. विशाखाताईंनी सुमारे 10 वर्षांपूर्वी पुण्यातील गीता धर्म मंडळातर्फे घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु, ज्ञानमार्गाच्या पांथस्त असल्यामुळे त्यांना या क्षेत्रात आणखी काही तरी करायची इच्छा होती. अशात डॉ. मालती निमदेव यांच्याकडून त्यांना शृगेरी पीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या “गीता ज्ञानयज्ञ” परीक्षेसंदर्भात माहिती मिळाली. ही परीक्षा मौखिक असली तरी पाणिनीच्या व्याकरणावर आधारित स्वरोच्चारांसह घेतली जाते. त्यासाठी विशाखाताईंनी पुण्यातील सुनिती उटांगळे यांचा ऑनलाईन क्लास केला. या क्लासमधून 6 जणींचा एक गृप तयार करण्यात आला. ही परीक्षा समूहिक घेतली जात असल्यामुळे त्यासाठी गृपची गरज होती. त्युनासार नागपुरातून विशाखा पाठक, निशा खंडाळकर, उर्वरित चौघीजणी पुण्याच्या आणि एक अमेरिकेतील अशा सर्वजणी एकत्र आल्यात. या परीक्षेसाठी विशाखाताईंनी अतिशय परिश्रमपूर्वक तयारी केली. यापूर्वी पाठ असलेल्या गीता पठनाऐवजी व्याकरणाच्या सिद्धांत आणि नियमानुसार पुन्हा एकदा संपूर्ण गीता नव्याने पाठ केली. त्यासाठी त्यांनी मैत्रिणी आणि नातवासोबत 6 महिने सराव केला.

त्यानंतर शृंगेरी पीठाकडे परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली. तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या परीक्षेची तारीख ठरली. त्यानुसार 32 तासांचा प्रवास करून सर्व 6 जणी शृंगेरी पीठात एकत्र आल्यात. याठिकाणी त्यांनी तब्बल 3 तास परीक्षा झाली. परीक्षकांकडून त्यांना कुठलाही श्लोक, उवाच विचारले जायचे आणि परीक्षार्थींना ते श्लोक सविस्तर वर्णनासह म्हणावे लागतात. प्रत्येक परीक्षार्थ्याला 45 ते 50 श्लोक म्हणून दाखवावे लागतात. परीक्षेनंतर अवघ्या काही तासातच निकाल जाहीर करून प्रमाणपत्र प्रदान केले जाते. विशाखा पाठक आणि त्यांच्या सहअध्यायींनी केलेल्या गीता पठनाचे दस्तुरखुद्द शंकराचार्यांनी कौतुक केले. अध्यात्म आणि धर्म या क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तीकडून होणारे कौतुक अतुलनीय असते. या अतुलनीय कौतुकाची कृतार्थता विशाखाताईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. धर्म, अध्यात्माच्या माध्यमातून ईश्वराकडे नेणाऱ्या मार्गावर आपण एकट्यानेच चालू नये तर इतरांनाही वाट दाखवावी या हेतूने विशाखाताईंनी 21 जणींना गीता पठनासाठी तयार करायचे असा संकल्प सोडलाय. आजवरचा त्यांचा व्यासंग आणि ध्येयासक्ती पाहता हा संकल्प त्या लवकरच पूर्ण करतील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles