नाशिक (Nashik) :- राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. निकाल संशयास्पद असून त्याबाबत राज्यात कोठेही आनंदाचे वातावरण दिसुन येत नाही. आणि या देशांमध्ये लोकशाही जिवंत राहावी , यासाठी ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे , अशी मागणी नाशिक जिल्हा महानुभाव पंथ आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आज शुक्रवार , १३ डिसेंबर रोजी नाशकात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .’ईव्हीएम हटाव , देश बचाव ‘ यासह अशा प्रकारच्या घोषणांनी नाशिक शहर दुमदुमले होते . ईव्हीएम विरोधात राज्यासह देशात निघालेला हा प्रथमच असा भव्य मोर्चा बघून नागरिकांनी सुद्धा या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .
या विराट मोर्चात बोलताना अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य ह . भ . प . जनार्दन बळीराम महाराज कांदे ( काकडे महाराज ) यांनी सांगितले की , आपल्या भारत देशाचे संविधान वाचावे. आणि महत्वाची बाब हा देश एकाधिकारशाही कडे जाऊ नये. त्यासाठी आज आम्ही जरी अध्यात्माचे काम करत असलो, तरी पण आमचे भारत देशावर प्रेम आहे. या देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी राहिला पाहिजे. सर्व जाती धर्माची माणसे एकोप्याने राहिली पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये. यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी व ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू-भगिनी यात सहभागी झाले होते. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या प्रश्नाकडे संबंधित सर्व यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सर्व नागरिक प्रचंड मोठ्या संख्येनेया मोर्चात सहभागी झाले होते .
आज दुपारी १ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून या मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सुरू होता . हा मोर्चा शांततेच्या लोकशाही मार्गाने सुरु होता. सदर मोर्चा गोल क्लब मैदानापासून निघून त्रंबक रोड ,गंजमाळ , शालिमार , टिळक पथ, एम जी रोड मार्गे दुपारी २ वाजेच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले .
याप्रसंगी महानुभाव पंथाचे महंत कृष्णराज बाबा मराठे, अ. भा. वा. वि. मंडळाचे राज्य कमिटी सदस्य ह . भ . प . जनार्दन बळीराम कांदे (काकडे महाराज ), महंत वाल्हेराज बाबा पातुरकर , महंत सायराज बाबा लोणारकर , माजी आमदार अनिल कदम , माजी आमदार जे.पी. गावित , मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते दिनकर अण्णा पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार , मनसेचे सलीम शेख , गोकुळ पिंगळे आदि सहभागी होते .या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
ईव्हीएम हटवा आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात , अशी आम्ही शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली. तरी देशातुन ईव्हीएम हद्दपार करून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन मतदारराजाला न्याय मिळावा. ईव्हीएम लवकर हद्दपार झाले नाही , तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल व त्यामुळे काही कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडल्यास त्यास सर्वस्वी संबधित यंत्रणात जबाबदार राहतील , याची नोंद घ्यावी,असेही या निवेशनात म्हटले आहे .
यावेळी भाषणात मान्यवरांनी सांगितले की , निवडणूकीत सुमारे ७४ लाख मते वाढले , बॅलेट पेपरवर मतदान घ्यावी , वाईट गोष्ट म्हणजे निवडणूकीत पडणार होते तेच उमेदवार निवडून आले , कारण सरकारी अधिकारीही सामील झाल्याचा संशय आहे . आता हे राज्य पहिल्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर गेले आहे . महायुतीचे सरकार हे खोट्या पद्धतीने सत्तेत आले. त्यामुळे फेर मतदान घ्यावे. अन्यथा आपला देश आणि महाराष्ट्र राज्य भविष्यात देशोधडीला लागेल.