लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबईतील मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. यात शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश आहे. रोहित पवार यांनी प्रचारादरम्यान विरार ते दादर लोकल रेल्वेने प्रवास केला. यात आपण मुंबईतील राजकीय हवामानाचा अंदाज घेतला असून संपूर्ण मुंबईत महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण असल्याचे जाणवले, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातील माहिती पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मुंबईत अनेकदा लोकलने प्रवास करण्याची संधी मिळते आणि लोकलचा प्रवास मला आवडतोही. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत पोहचायचं असल्याने नाशिकची सभा आटपून विरारला आल्यानंतर विरार ते दादर लोकलने प्रवास केला. यावेळी रोज लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी चर्चा करून मुंबईतील राजकीय हवामानाचा अंदाज घेतला आणि संपूर्ण मुंबईत महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण असल्याचं जाणवलं.